सीधे मुख्य सामग्री पर जाएं

वर्ल्‍ड सस्‍टेनेबल डेव्‍हलपमेंट समिटच्‍या २५व्‍या पर्वाचे उद्घाटन

मुंबई। द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टेरी)चा वार्षिक प्रमुख उपक्रम वर्ल्‍ड सस्‍टेनेबल डेव्‍हलपमेंट समिट (डब्‍ल्‍यूएसडीएस) २०२६ च्या रौप्य महोत्सवी पर्वाचे औपचारिक उद्घाटन भारत सरकारचे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंदर यादव यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या मुख्य भाषणात माननीय मंत्री यांनी समानता, स्थिरता आणि शाश्वत वाढीवर आधारित भारताच्या हवामान विषयक महत्त्वाकांक्षेला प्रकाशझोतात आणले. हवामान आणि विकास कार्यातील परिवर्तनीय अजेंडा पुढे नेण्यासाठी या परिषदेत जागतिक नेते, धोरणकर्ते, उद्योजक, संशोधक आणि नागरी संस्था एकत्र आल्या आहेत.

'परिवर्तन: शाश्वत विकासासाठी दृष्टीकोन, आवाज आणि मूल्ये' या मुख्य संकल्पनेखाली आयोजित डब्‍ल्‍यूएसडीएसचे हे २५वे एडिशन समिटच्‍या वारशातील महत्त्वाचा टप्पा आहे. 'ग्लोबल साऊथमध्ये स्थित शाश्वत विकासावर स्वतंत्रपणे आयोजित केले जाणारे हे एकमेव आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आहे.

स्वागतपर भाषण सादर करत टेरीचे अध्यक्ष नितीन देसाई म्हणाले, “आजचे जग पूर्णपणे वेगळे आहे. आपल्या समोर जागरूकता निर्माण करण्‍याचे नाही तर प्रत्यक्ष कृती करण्‍याचे आव्‍हान आहे. वर्ल्‍ड सस्‍टेनेबल डेव्‍हलपमेंट समिटचा संपूर्ण प्रवास फक्त जागरूकतेबाबत बोलण्‍यापर्यंत मर्यादित राहिला नाही, तर शाश्वततेला चालना देण्यासाठी आवश्‍यक असलेल्‍या कृती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याकडे वळला आहे. आपल्यासमोर प्रत्यक्ष अंमलबजावणीची अत्यंत गंभीर समस्या आहे."

 टेरीच्‍या डायरेक्‍टर जनरल डॉ. विभा धवन आपल्या प्रास्ताविक भाषणात म्‍हणाल्‍या, “गेल्या २५ एडिशन्‍समध्‍ये डब्‍ल्‍यूएसडीएस हे ग्लोबल साऊथसाठी हवामान बदल आणि शाश्वत विकासावरील चर्चेला आकार देणारे एकमेव स्वतंत्रपणे आयोजित व्यासपीठ म्हणून विकसित झाले आहे. आपण आतापर्यंत पुरेशी चर्चा केली आहे, पण आज आपल्याला भारत आणि जागतिक अशा दोन्ही स्तरांवर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे."

आपल्‍या भाषणाची सांगता करण्‍यापूर्वी डॉ. धवन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेला एक विशेष संदेश वाचून दाखवला. त्‍यामधील एक भाग होता की, ''आमचा दृष्टीकोन अंत्योदय म्हणजेच अगदी वंचित घटकाच्या उत्थानाने प्रेरित आहे. हवामान कृतीतून सर्वात आधी असुरक्षित, गरीब आणि वंचित घटकांचे संरक्षण झाले पाहिजे. हवामान बदलाचा सर्वाधिक आणि विसंगत फटका ग्लोबल साऊथला बसत आहे. तरीही, त्यांच्यासाठी विकास अनिवार्य गरज आहे. म्हणूनच हवामान न्याय अत्यंत आवश्यक आहे. विकसनशील देशांनी पृथ्वीचे रक्षण करताना गरिबी आणि भूक यांचेही निर्मूलन केले पाहिजे. यासाठी तंत्रज्ञान हस्तांतरण, वित्तपुरवठा आणि भागीदारीची आवश्यकता आहे. विकसित देशांवर अधिक वेगाने पावले उचलण्याची, शाश्वत जीवन जगण्याची आणि मोठ्या प्रमाणावर वित्त व तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची विशेष जबाबदारी आहे. ही परिषद आपला संकल्प दृढ करो, सहकार्य वाढवो आणि आपल्या पृथ्‍वीसाठी शाश्वत भविष्य सुरक्षित करो. मी डब्‍ल्‍यूएसडीएसच्या या रौप्य महोत्सवी एडिशनमध्‍ये उत्‍पादनक्षम आणि भविष्यवेधी चर्चेसाठी शुभेच्छा देतो."

आपल्या भाषणात टाटा ट्रस्टचे सीईओ सिद्धार्थ शर्मा म्‍हणाले, “ही प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आहे. महत्त्वाचे म्‍हणजे, आपण हवामान बदलाबाबत करत असलेल्‍या चर्चेला प्रत्‍यक्षात कृतीत आणले पाहिजे. हा विषय फक्त परिषदा, बैठका किंवा बोर्डरूममधील चर्चेपुरता मर्यादित राहता कामा नये. तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, त्यांना प्रत्‍यक्ष कृतीचा होणारा परिणाम समजला पाहिजे. त्यानंतर आपल्याला स्‍थानिक स्‍तराशी संलग्‍न असलेल्‍या उपायांवर काम करावे लागेल आणि यामध्‍ये आपण निराकरणासह अनुकूलन प्रक्रियेला देखील महत्त्व दिले पाहिजे.''

टिप्पणियाँ