मुंबई। वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट (डब्ल्यूएसडीएस) २०२६ या एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटतर्फे (टेरी) आयोजित करण्यात आलेल्या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी शाश्वततेवरील जागतिक चर्चा आणखी पुढे गेली. निसर्गाच्या दृष्टीने उपकारक विकास, पर्यावरणपूरक औद्योगिक रूपांतरण, भविष्यकालीन तंत्रज्ञान आणि पुनरुज्जीवित बहुपक्षीय सहकार्य यांवर या चर्चेचा भर होता. डब्ल्यूएसडीएसचे हे २५वे पर्व आहे.
बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल एका उच्चस्तरीय सर्वसदस्यीस बैठकीत म्हणाले, “गेल्या दहा वर्षांत सध्याच्या सरकारच्या नेतृत्वाखाली भारताच्या सागरी वाहतूक क्षेत्रात सखोल कायापालट झाला आहे, यात शाश्वतेवर आधारित क्षमता विस्तार आणि कार्यक्षमतेतील लाभाचा समावेश होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुधारणा, कामगिरी व रूपांतरण यांवर आधारित दृष्टीच्या मार्गदर्शनाखाली सागरी वाहतूक प्रशासनाने आज पर्यावरणपूरक वाढीला आर्थिक विकासाच्या केंद्रस्थानी ठेवले आहे. भारत संस्थात्मक सुधारणा आणि आंतरराष्ट्रीय सहयोग यांच्या पाठिंब्याने बंदरांमध्ये नवीनीकरणीय ऊर्जेच्या स्वीकृतीसाठी, कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्यासाठी, पर्यावरणपूरक जहाजमार्ग तयार करण्यासाठी तसेच मोठ्या प्रमाणावर पर्यावरणपूरक हायड्रोजनचे उत्पादन करण्यासाठी बांधील आहे.”
मंत्रीस्तरीय सत्रात श्रीलंका, नेपाळ, मालदिव्ज, जर्मनी आणि स्वीडनच्या प्रतिनिधींनी हवामान बदल, हिमालयीन परिसंस्थेची नाजूक स्थिती आणि वाढती समुद्रपातळी यांसारख्या आव्हानांवर मात करण्यासाठी प्रभावी बहुपक्षीय सहकार्याची गरज अधोरेखित केली.
संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या (यूएनईपी) आशिया आणि पॅसिफिक विभागाच्या प्रादेशिक संचालक डेशेन त्सेरिंग म्हणाल्या, “आजचे खरे आव्हान महत्त्वाकांक्षा नसून, वित्तपुरवठा हे आहे. निसर्गासाठी जेवढी गुंतवणूक आपण करत आहोत, त्याहून खूप अधिक पैसा निसर्गाची हानी करणाऱ्या कृतींसाठी सातत्याने खर्च केला जात आहे. म्हणूनच आपल्याला वित्तीय प्रणालींमध्ये सुधारणा घडवून आणण्याची गरज आहे, जेणेकरून, सार्वजनिक खर्च हवामान आणि निसर्ग यांसंदर्भातील उद्दिष्टांशी सुसंगत राहील, हानीकारक कारणांसाठी दिली जाणारी अनुदाने दुसरीकडे वळवली जातील आणि खासगी भांडवलही मोठ्या प्रमाणात एकत्र आणले जाईल.”
‘हिमालयन कोअॅलिशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ सत्रात पर्वतीय परिसंस्थांच्या संरक्षणासाठी विज्ञान, डेटा आणि समुदाय सहभागावर आधारित संतुलित धोरणांची गरज व्यक्त झाली. स्टार्टअप नवोन्मेष, हरित बांधकाम, ग्रीन स्टील आणि हवामान कृतीत महिलांची भूमिका यांवरही चर्चा झाली.
स्टार्टअप्समधील नवोन्मेष, नैसर्गिक आणि स्थितीस्थापक पर्यावरणाची बांधणी, सार्वजनिक खरेदीमार्फत पर्यावरणपूरक स्टीलला मागणी निर्माण करणे तसेच हवामानासंदर्भातील कृती, जैवविविधता संवर्धन आणि जमिनीचे पुनरुज्जीवन या आघाड्यांवरील स्त्रियांची महत्त्वपूर्ण भूमिका आदी विषयांवर दिवसभर चाललेल्या सत्रांमध्ये प्रकाश टाकण्यात आला.
डब्ल्यूएसडीएस २०२६ मध्ये जागतिक नेत्यांनी दिलेला संदेश स्पष्ट आहे: टप्प्याटप्प्याने काम करण्याचा काळ संपला आहे- या दशकात विज्ञान, ऐक्य आणि व्यापक उपायांच्या पायावर रूपांतरणात्मक कृती करणे अत्यावश्यक आहे.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें