मुंबई। द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट अर्थात टेरीने आयोजित केलेल्या वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिटी (डब्ल्यूएसडीएस) २०२६ची सांगता विचार आणि नवीन वचनासह झाली. ‘रिफ्लेक्शन्स, रिसर्जन्स अँड रिजॉल्व फॉर अवर कॉमन फ्युचर (आपल्या सर्वांच्या भविष्यकाळासाठी विचार, पुनरुत्थान आणि निर्धार)’ या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आलेल्या निरोपाच्या सत्रात अनेक सरकारांचे प्रतिनिधी, बहुपक्षीय संस्था, व्यवसाय व नागरी समाजाचे प्रतिनिधी एकत्र आले होते.
केवळ जगभरातील मते एकत्र आणणारा नव्हे, तर हवामानासाठी ठोस कृतीला संप्रेरणा देणारा मंच ही डब्ल्यूएसडीएस २०२६ची ओळख, प्रख्यात दरबार हॉलमध्ये झालेल्या अखेरच्या सत्रामुळे आणखी दृढ झाली.
निरोपाच्या सत्रात अनेक विख्यात वक्त्यांची भाषणे झाली. हवामानविषयक कृतीच्या पुढील टप्प्यात जबाबदारी, अंमलबजावणी आणि अनेक पिढ्यांतील नेतृत्व असलेच पाहिजे हा मुद्दा या भाषणांतून अधोरेखित झाला.
भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे (एमओईएफसीसी) पर्यावरण, वन आणि हवामान बदल सचिव तन्मय कुमार म्हणाले, "हवामान बदल हा केवळ पर्यावरणाचा मुद्दा नसून विकास, प्रशासन, सुरक्षितता आणि मानवी आरोग्यासमोरील मोठे आव्हान आहे. भारताचा दृष्टीकोन विज्ञानाधारित आणि न्यायाभिमुख असून, पर्यावरणपूरक ऊर्जेला उपजीविका आणि स्थितीस्थापक विकासाशी जोडले आहे. विकसित देशांनी मोठ्या प्रमाणावर उत्सर्जन करून औद्योगिकीकरण केले, मात्र भारत विकास, दारिद्र्यनिर्मूलन आणि कार्बनमुक्ती हे एकाच वेळी साध्य करत आहे. दरडोई केवळ २ टन उत्सर्जनासह भारताने २०३०चे अजीवाष्म ऊर्जेचे ५०% उद्दिष्ट जून २०२५ मध्येच पूर्ण करून ते ५१% पेक्षा अधिक केले आहे. मानवतावाद, विज्ञान आणि न्याय यांच्या आधारावर भविष्य सुरक्षित करण्याचा भारताचा निर्धार आहे."
संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रमाच्या सदिच्छादूत दिया मिर्झा म्हणाल्या, “हवामानातील बदलाचा परिणाम सर्व लिंगांवर सारखाच होत नाही. स्त्रिया आणि मुली जगातील बहुतांश अन्नाची पेरणी करत असल्या आणि कुटुंबं व समुदायांची जोपासना करत असल्या तरी हवामान बदलाच्या परिणामांची तीव्रता त्यांना अधिक जाणवते. तरीही हवामान आणि ऊर्जा यांसंदर्भातील निर्णय प्रक्रियेत त्यांना तेवढे प्रतिनिधीत्वही मिळत नाही. शाश्वतता हा आज ऐच्छिक विषय राहिलेला नाही, तर जगण्याचा, प्रतिष्ठेचा आणि शांतीचा पाया झाला आहे. निसर्गाशी संवाद साधणे ही आता चैनीची बाब राहिलेली नाही, तर प्रत्येक व्यक्तीची ती गरज झाली आहे.”
संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रमाच्या उपनिवासी प्रतिनिधी श्रीमती इसाबेल तुशान यांनी भारतातील ६५% तरुण लोकसंख्या शाश्वततेच्या अंमलबजावणीसाठी निर्णायक असल्याचे सांगत, यूएनडीपीने पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि टेरीसोबत ‘मिशन लाइफ युथ अँबॅसडर’ कार्यक्रम सुरू केल्याचे नमूद केले.
रिन्यूच्या चेअरमन वैशाली निगम सिन्हा यांनी विकास आणि हवामान ही आता समान उद्दिष्टे असून, पर्यावरणपूरक ऊर्जा आर्थिकदृष्ट्या अपरिहार्य झाल्याचे सांगितले. ‘ग्लोबल साउथ’ उपाय सुचवत असून परिषद ही केवळ चर्चा नसून कृतीचा आदेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पीओपी (प्रोटेक्ट अवर प्लॅनेट) चळवळीचे सहसंस्थापक आणि ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. अॅश पचौरी यांनी डब्ल्यूएसडीएसच्या २५ वर्षांच्या प्रवासाचा उल्लेख करत, भूतकाळ साजरा करताना पुढील सामाईक जबाबदारी स्वीकारण्याची गरज अधोरेखित केली.
कूल द ग्लोबच्या संस्थापक प्राची शेवगावकर यांनी वैयक्तिक छोट्या कृतीतून सुरू झालेली चळवळ आज १५० देशांपर्यंत पोहोचल्याचे सांगत, शाश्वतता दैनंदिन जीवनाचा भाग करण्याचे आवाहन केले.
टेरीचे चेअरमन नितीन देसाई यांनी सरकार, उद्योग, संशोधक आणि समुदाय यांच्या सहकार्याशिवाय शाश्वत विकास शक्य नसल्याचे सांगितले, तर महासंचालक डॉ. विभा धवन यांनी सहयोग आणि विद्यमान संशोधनाचा प्रभावी वापर हीच पुढील वाट असल्याचे नमूद केले.
क्युरेटर डॉ. शैली केडिया यांनी यंदाच्या परिषदेत विक्रमी २,३८२ सहभाग, १० पूर्णसदस्य व १४ विषयाधारित सत्रे आणि ‘हिम-कनेक्ट’सारख्या उपायाधारित चर्चांचा उल्लेख केला. समारोपात ‘वसुंधरा’ मासिकाचे अनावरण, ‘अॅक्टफॉरअर्थ मॅनिफेस्टो’ प्रकाशन आणि नितीन देसाई लिखित द पॉलिटिक्स ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट पुस्तकाचे प्रकाशन झाले.
डब्ल्यूएसडीएस २०२६ ने स्पष्ट संदेश दिला—हवामान दशकात वित्त व न्याय, नवोन्मेष व समावेशकता, तसेच महत्त्वाकांक्षा व जबाबदारी यांचे अभिसरण अत्यावश्यक आहे; आणि जागतिक स्तरावर रूपांतरणात्मक हवामान कृतीसाठी दृढ सहयोग हाच पुढील मार्ग आहे.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें